नाशिक मध्ये अश्या प्रकारची सेवा देणाऱ्या सौं. मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे या आपल्याशी येणाऱ्या कालावधी मध्ये संवाद साधणार आहेत ..समुपदेशन केल्याने त्यांनी कश्या प्रकारे विविध अडचणी सोडवल्या याची माहिती त्या आपल्याला देणार आहेत .समुपदेशन म्हणजे काय ?? कश्या साठी ते आवश्यक ?? या बाबीवर प्रकाश टाकणारा हा पहिला लेख.
आजमितीला समाजामध्ये घटस्फोट, विवाहितांच्या आत्महत्या, विवाह बाह्य अनैतिक संबंध त्यातून घडणारे गुन्हे, घातपात यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. पती पत्नी मधील, कुटुंबातील सर्व सदस्यांमधील असलेला संवादाचा आभाव, कमी होत चाललेली पारदर्शकता यातून वैवाहिक क्लेश, विभक्त होणे यासारख्या घटना घडत आहेत.
समाजातील प्रत्येक स्तरावर या समस्या विकोपाला गेल्याचे दिसते. सुशिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत अश्या सर्व प्रकारच्या कुटुंबामध्ये हें प्रश्न निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी याला वाचा फोडली जाते तर काही कुटुंब सामाजिक प्रतिष्टेला घाबरून आहे ती परिस्थिती स्वीकारून यातून होणारा मानसिक त्रास सहन करीत राहतात.
अश्या वेळी समाजात आपली पत, प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये चर्चा होऊ नये, बदनामी होऊ नये म्हणून सर्वसामान्य माणूस कायदेशीर मदत घ्यायला देखील घाबरतो. कोणत्याही महिलांना, युवतींना कौटुंबिक वाद, त्रास, हिंसाचार, लैंगिक अत्याचार तसेच वैवाहिक आयुष्यात कोणत्याही स्वरूपाच्या समस्या असल्यास, त्या समस्या समजून घेणे, त्यांच्या माहेर सासर मधील कुटुंबियांना विश्वासात घेऊन आपसातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांना समुपदेशन आणि सर्व प्रकारचे मार्गदर्शन आपण करीत आहोत.
अनेकदा कौटुंबिक वाद विवाद, पती- पत्नी मधील कलह विकोपाला जातात आणि पती पत्नी अथवा नातेवाईक टोकाची भूमिका घेतात. यातून नातेसंबंध अधिक बिघडून त्याचे नकारात्मक परिणाम होतात. आपल्याला सहकार्य करायला, मदत करायला पोलीस प्रशासन, न्यायालय सदैव तत्पर आहेच. परंतु केवळ समोरच्याला त्याचा बदला घेण्यासाठी, सूड घेण्यासाठी, अद्दल घडवण्यासाठी कायद्याचा गैरवापर काही लोकांकडून केला जातो.
तरीही आपला, आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आपण सकारात्मक मार्ग कोणत्याही परिस्तिथी मधून काढू शकतो. अनेक कौटुंबिक समस्या आपण समुपदेशन घेऊन सोडवू शकतो, तसेच सखोल कायदेशीर मार्गदर्शन देखील आपले मत आणि मन परिवर्तन बदलू शकते याचा खूपदा अनुभव येत आहे.
त्यामुळेच कोणताही टोकाचा निर्णय अथवा भूमिका घेणे आधी सर्व उपलब्ध पर्यायांवर मार्गदर्शन घेणे, कायदेशीर बाबी आणि त्याचे चांगले वाईट परिणाम जाणून घेणे आणि योग्य तो निर्णय घेणे खूप महत्वाचे आहे. कायद्याविषयक असलेली अपुरी माहिती, अर्धवट ज्ञान, आजूबाजूच्या लोकांनी किंवा नातेवाईकांनी कोणताही अनुभव अथवा अभ्यास नसताना दिलेले सल्ले आपल्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जातात. अश्यावेळी वैवाहिक समस्यांवर केलें जाणारे समुपदेशन आपल्याला खूप मोठा पाठींबा देऊ शकते आणि आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करू शकते. अनेकदा विवाहित पुरुष देखील वैवाहिक आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जात असतात. परंतु सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदारी यामुळे त्यांना प्रापंचिक आणि वैयक्तिक समस्या कोणासमोर मांडणे शक्य होत नाही. तरी अश्या पुरुष बांधवाना देखील आपण समुपदेशन आणि मार्गदर्शन या मार्फत योग्य ते सहकार्य करतो. या सर्व प्रक्रियेमध्ये विवाहितांची वैयक्तिक माहिती नाव गोपनीय राहील. तसेच केस संदर्भातील सर्व माहिती गोपनीय राहील.
सौं. मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 9834114342, 9766863443.