वैमानिक कॅप्टन रश्मी मुठे (गायधनी) यांचे निधन.
नाशिक – देशातील पहिल्या १०० महिला कमांडर मधील एक अशा व एअर इंडिया मध्ये वैमानिक म्हणून कार्यरत व मूळ नाशिककर असलेल्या कॅप्टन रश्मी मुठे (गायधनी) यांचे आकस्मिक निधन झाले.
सुमारे २५ वर्षापासून एअर इंडिया मध्ये वैमानिक म्हणून कार्यरत असणा-या कॅप्टन रश्मी यांचे शिक्षण नाशिकच्या सारडा कन्या विद्यालय येथे झाले होते. सुरुवातीपासूनच कॅप्टन रश्मी हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात असत.
१२ वी नंतर व्हीजीटीआय या आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांना कॉम्प्यूटर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळाला. पण काहीतरी वेगळे करायची जिद्द मनाशी बाळगून त्यांनी वैमानिक होण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात अशा प्रशिक्षणाच्या सोयी व माहितीची साधने खूपच मर्यादित होती परंतु आपल्या जिद्दीने त्यांनी वैमानिक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले व त्या एअर इंडिया मध्ये रुजू झाल्या.
त्यांच्या २५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी अनेक आव्हानांचा यशस्वी सामना केला. २००५ मध्ये मुंबई व २०१८ मध्ये चेन्नई येथील अतिवृष्टीच्या प्रसंगी जेव्हा रनवे वर पाणी जमले होते त्या कठीण परिस्थितीत त्यांनी विमानाचे यशस्वी लॅन्डिंग केले होते. त्यासाठी त्यांना गौरवण्यात आले होते. त्याप्रमाणेच बोईंग-७४७ ड्रीमलाईनर या विमानासाठी देखील वैमानिक म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.
त्यांची आई सुमन मुठे या निवृत्त प्राध्यापिका व लेखिका असून वडील मारुती मुठे हे निवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. त्यांचे पती ले. कर्नल पराग गायधनी हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत.