भारतातील महत्वाच्या चार धाम पैकी पूर्वेकडील जगन्नाथ पुरी ला पुराणांमध्ये अनेक नावाने संबोधले जाते, जसे निलांचाल, नीलाद्री , निलगिरी, शंखक्षेत्र श्रीक्षेत्र , पुरुषोत्तम क्षेत्र , जगन्नाथ धाम , जगन्नाथ पुरी।
स्थापत्य कलेचे एक अदभुत उदाहरण
मंदिराला 20 फूट उंच तटबंदी आहे , 4 लाख स्क्वेअरफुट क्षेत्रफळात हे विस्तृत पसरले आहे, या मंदिराची उंची 214 फूट आहे , घुमटावर पंचधातूंचे बनलेले सुदर्शन चक्र आहे , चार दिशांना 4 मोठे द्वार आहे, पूर्वेचे द्वार भव्य आहे येथे विशालकाय सिंहाची मूर्ती आहे, म्हणून याला सिंह द्वार म्हणतात, पश्चिमेच्या द्वाराला व्याघ्र द्वार म्हणतात, दक्षिनद्वाराला अश्व द्वार व उत्तर द्वाराला हस्ती द्वार म्हणतात. मंदिर 4 भागात विभागले आहे
भोग मंदिर : येथे भगवान जगन्नाथाल नैवेद्य दिला जातो .
रंग मंदिर : येथे नृत्य , गायन , कलांचा अभ्यास होतो.
सभा मंडप : येथे तीर्थ यात्री बसून भजन पूजन करतात .
अंतराळ : येथे मुख्य गर्भ गृह असून देवाच्या मूर्ती आहेत .
पौराणिक संदर्भ
हे मंदिर मालवाच्या राजा इंद्रद्युम याने बांधले
त्रेता युगाच्या अंताला भगवान विष्णू पुरीच्या समुद्र किनाऱ्या जवळ एक वटवृक्षाखाली निलमणीच्या रुपात विराजमान होते .निलमणी च्या दर्शनाने मोक्ष प्राप्ती होत असे, त्या मुळे यमराजाने हा निलमणी पृथ्वी मध्ये लपवून ठेवला , परंतु द्वापार युगामध्ये मालवा प्रांताचा राजा इंद्रद्युम याला या अद्भुत मणी बद्दल समजले तेव्हा त्याला निलमणी चे दर्शन घेण्याची प्रखर इच्छा झाली , तेव्हा त्याने या निलमणी चा शोध घेतला त्यावेळी तो निलमणी अदृश्य झाला .
इंद्रद्युम राजाने कठोर तपश्चर्या केली त्यावेळी भगवान विष्णूने त्याला दृष्टांत देऊन सांगितले की तू पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर जा , समुद्राच्या पाण्यात जो ओंडका तरंगताना मिळेल त्या पासून तू भगवान जगन्नाथ, बलभद्र, व सुभद्रा च्या मूर्ती बनाव व त्याची स्थापना कर .राजा इंद्रद्युम याने देवतामधील रचनाकार विश्वकर्मा याना पाचारण करून सुंदर मंदिर बनवण्यास सांगितले.त्यावेळी स्वतः भगवान विष्णू तेथे मूर्तिकाराच्या रुपात प्रकट झाले व त्यांनी सांगितले की मी सलग 21 दिवस एका खोलीत बसून मूर्ती बनवेन परंतु त्या खोलीत कोणी यायचे नाही .
15 दिवसा नंतर राणीला संशय आला की या खोलीतून काहीच आवाज येत नाही , मूर्तिकाराला काही झाले का ? तिने राजाकडे हट्ट केला की मला त्या खोलीत जाऊन बघायचे आहे , राजाने त्या खोलीचे दार उघडले त्या वेळी विष्णू अंतर्धान पावले व मूर्ती अर्धवट राहिल्या , त्या वेळी आकाशवाणी झाली की या मूर्ती ज्या सस्थितीत आहेत त्या स्थितीत स्थापन करा, राजाने त्या मूर्तीची स्थापना मंदिरात केली .
या मूर्ती साक्षात भगवान विष्णू ने बनविल्या आहेत, असे म्हणतात या मूर्तीच्या आत जो लाकडाचा लगदा आहे तो साक्षात देवाचा आत्मा आहे, दर 12 वर्षांनी जेव्हा मूर्ती बदलल्या जातात तेव्हा मूर्ती बनवणाऱ्यांच्या हाताला कपडा बांधला जातो व डोळ्यावर पट्टी बांधली जाते. कारण जो कोणी याकडे बघेल त्याला मृत्यू येईल अशी मान्यता आहे.
. येथे अनेक अश्या गोष्टी आहेत ज्याचे उत्तर विज्ञानाकडे पण नाही
1. या मंदिराच्या कळसावर सूर्याचे चिन्ह असलेला एक ध्वज रोज बदलला जातो , एका ठराविक घराण्यातील एक पुरुष रोज कळसापर्यंत चढून जाऊन ध्वज बदलतो , मात्र हा ध्वज हवेच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेला फडकतो .
2. या मंदिराची उंची 214 फूट आहे परंतु कोठेही घुमटाच्या सावली पडत नाही .
3. येथे कोणतेही पक्षी मंदिराच्या घुमटाजवळ येत नाही , कोणतेही विमान मंदिरावरून उडत नाही.
4. मंदिराच्या कळसावर स्थापन असलेले पंचधातूंचे सुदर्शन चक्र कोठूनही बघितले तरी आपल्या समोरच असल्यासारखे दिसते.
5 . येथे हवा जमिनिकडून समुद्रा कडे वहाते .
6. हे मंदिर समुद्राच्या जवळ आहे परंतु मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर येणारा समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिराच्या आत पाऊल ठेवल्यावर ऐकू येत नाही , तसेच मंदिरात स्वर्ग द्वार आहे. येथे प्रेत जाळल्या जातात पण त्याचा मंदिरात येत नाही , पण मंदिरातून बाहेर पडल्यास वास येतो.
7. पुरीच्या मंदिरात दररोज जवळपास 20 लाख भाविकांसाठी प्रसाद बनतो , हा संपुर्ण प्रसाद लाकडावर बनवला जातो , एका वर एक सात हंडी ठेऊन प्रसाद बनवतात , परंतु आश्चर्याची बाब ही की सर्वात प्रथम वरच्या भांड्यात प्रसाद शिजतो व खालच्या भांड्यात सर्वात शेवटी प्रसाद शिजतो .
रथयात्रा
या ठिकाणी आषाढ महिन्यात रथयात्रा होते हा 10 दिवसाचा उत्सव असतो .रथ यात्रेची सुरवात वसंतपंचमी ला लाकडे गोळा करायला सुरुवात करण्या पासून होते, ही लाकडे लिंबाच्या झाडाची असतात , ही झाडे निरोगी असावे लागते.वाडा रोला ठाकुराईन या गावदेवीच्या मंदिरात या लाकडाची पूजा होते व अक्षय त्रितीये पासून रथ बनवायला सुरवात होते .बलभद्र च्या रथा ला बालध्वज म्हणतात, लाल व हिरव्या रंगाच्या कापडापासून 763 लाकडाच्या तुकड्यात हा रथ बनवतात.सुभद्राचा रथ लाल व काळ्या कापडापासून बनवतात याला पदमध्वज म्हणतात , सुदर्शन चक्राची मूर्ती सुभद्राच्या रथात ठेवतात , जगन्नाथाच्या रथाला गरुड ध्वज म्हणतात, या साठी लाल व पिवळा रंगाच्या कापडाचा वापर करतात.
आषाढ शुक्ल द्वितीयेला रथ सिंह द्वाराशी आणून पूजा करतात व दुसऱ्या दिवशी रथ यात्रेला सुरवात करतात
5 km ची ही यात्रा मुख्य मंदिरापासून गुंडीच्या मंदिरात जाते, असे म्हणतात की हे भगवंताचे जन्म स्थान आहे , गुंडीच्या मंदिरात भगवंतांचे 9 दिवस वास्तव्य असते या नंतर परत मुख्य मंदिरात परततात
कसे जाल ??
जगन्नाथ पुरी येथे पोहचण्यासाठी रेल्वे व बसने पोहचता येथे , विमानाने जायचे असेल तर जवळचे विमानतळ भुवनेश्वर येथे आहे, भुवनेश्वर ते पुरी 60 km अंतर आहे.
पुरी येथे 3 रात्र वास्तव्य केल्यास आजूबाजूचा परिसर म्हणजे, कोणार्क सूर्य मंदिर , भुवनेश्वर शहर , चिल्का लेक बघता येतो .
जगन्नाथ पुरी जसे धार्मिक स्थळ आहे तसेच पर्यटक स्थळ पण आहे , पुरी ला अथांग समुद्र किनारा लाभल्याने , पर्यटक येथे बीच वर खेळण्याचा आनंद घेतात ओरिसा राज्यातील हे एक मोठे पर्यटक ठिकाण बनले आहे .
मंगेश कपोते- हेरंब ट्रॅव्हल,औरंगाबाद